कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी महाडिकांचा पाठपुरावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन

नवी दिल्ली : नवप्रवाह मराठी

 कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे सुविधांच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. कोल्हापूर–मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम तातडीने सुरू करून गतीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.


कोल्हापूर–मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली असली तरी जमीन संपादनासह आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी खासदार महाडिक यांनी केली. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतरच नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर–मिरज–पंढरपूर, कोल्हापूर–पंढरपूर–तिरुपती तसेच गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या नवीन रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली. तसेच कोल्हापूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सातही दिवस सुरू करावी, कोल्हापूर–मुंबई वंदे भारत सेवा सुरू करावी आणि सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत चालवावी, अशी मागणीही करण्यात आली.

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास, मालवाहतूक सुविधांचा विस्तार आणि रखडलेले रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ण करून कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला चालना द्यावी, अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली.

Post a Comment

0 Comments